पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करत दहशत माजवणाऱ्या तन्मय भुयारी या आरोपीला अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. फिर्यादी व्यक्ती चहा पिण्यासाठी थांबले असताना, आरोपी तन्मय भुयारी व त्याचा साथीदार ज्ञानेश्वर जाधव यांनी रागाच्या भरात फिर्यादीवर लोखंडी हत्याराने वार करून गंभीर जखमी केले.
या घटनेमुळे सिंहगड कँपस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने शैक्षणिक वातावरणात खंड पडू लागला. या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(२), ३५२, व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची कसून तपास आणि अटक: अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि परिसरात पुन्हा एकदा शांतता नांदावी या उद्देशाने पोलीसांनी सखोल तपास सुरू केला. स्थानिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी तन्मय भुयारीचा शोध घेण्यात आला. दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी त्याला वडगाव येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांना भयमुक्त केले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थी आणि पालकांची भावना: सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं आहे. “आम्हाला आता थोडा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नसती, तर परिस्थिती आणखी बिघडली असती,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा: पोलिसांनी परिसरातील टवाळखोरांवर देखील लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशा गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी दिला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि समीर कदम, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस स्टाफ यांनी मोलाचा सहभाग दिला.
पोलिसांकडून आवाहन: विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. सायबर गुन्हे, टवाळखोरी, किंवा दहशतीसारख्या घटनांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ कारवाईसाठी पोलिसांच्या मदतीला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.