
1.बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी “महाराष्ट्र बंद”ची हाक दिली आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (SP) राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आणि भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या अपयशावर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, सर्व महाविकास आघाडीचे सहयोगी या बंदमध्ये सहभागी होतील.
2.बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना पुढील एका महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
3.कल्याण बार असोसिएशनने आपल्या सदस्यांना या प्रकरणातील आरोपीचे प्रतिनिधित्व न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनात काही समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
4.“बदलापूर रेल्वे स्थानकावर एवढी मोठी गर्दी कशी जमली याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या संदर्भातील काही फोन कॉल आणि व्हिडिओंचीही तपासणी केली जात आहे,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
5.बदलापूरमध्ये दोन बालिकांवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर बुधवारी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 72 जणांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
6.बदलापूर रेल्वे स्थानक आणि अन्य ठिकाणी आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत किमान 25 पोलीस कर्मचारी जखमी झाले. हजारो आंदोलकांनी रेल्वे रुळ अडवले आणि शाळेच्या इमारतीवर हल्ला चढवला.
7.मंगळवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेविरोधात कठोर कारवाई करण्याचे आणि दोषींना सोडणार नसल्याचे सांगितले.
8.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर महिलांच्या सुरक्षेप्रती गांभीर्य नसल्याचा आरोप केला. त्यांनी असेही आरोप केले की सरकार पक्ष तोडण्याच्या कामात व्यस्त आहे आणि सामान्य जनतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
9.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दावा केला की बदलापूरमधील आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होते आणि राज्य सरकारची बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले. त्यांनी असेही सांगितले की, आंदोलकांपैकी बहुसंख्य जण “बाहेरचे” होते.
10.पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मंत्रालयाच्या बाहेर आंदोलनाचे नेतृत्व केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुसीबेन शाह यांनी म्हटले, “ज्या शाळेत दोन लहान मुलींवर कथित लैंगिक अत्याचार झाला, त्यांनी पालकांना तक्रार नोंदवण्यास मदत करण्याऐवजी गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला.” त्यांनी असेही सांगितले की, “शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना वेळेवर कळवले असते, तर बदलापूरमधील गोंधळाची स्थिती टाळता आली असती.”




