जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला असून, २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी करार स्थगित केला, अटारी बॉर्डर बंद केली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत.
या भारताच्या निर्णायक भूमिकेनंतर पाकिस्ताननेही बिचकून प्रत्युत्तर दिलं असून, आता भारतीय गाण्यांवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधून भारतीय संगीतावर बंदीचा ‘सुर’
पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशनच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, १ मे २०२५ पासून संपूर्ण पाकिस्तानमध्ये एफएम रेडिओवर भारतीय गाणी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश यांच्यासारख्या भारताच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या गाण्यांनाही या बंदीचा फटका बसला आहे.
पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशनचे महासचिव शकील मसूद यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय संपूर्ण देशाच्या भावना लक्षात घेऊन घेतला आहे. देशाच्या अस्मितेवर कुठलाही आघात नको, म्हणून भारताच्या कोणत्याही सांस्कृतिक गोष्टीचे प्रसारण आता थांबवले जाईल.”
भारताची कडक भूमिका – पाकिस्तानची अडचणीत भर
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने केवळ शब्दांत नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत.
-
सिंधू नदी करार थांबवणे ही ऐतिहासिक कृती समजली जात असून, यामुळे पाकिस्तानच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
-
अटारी बॉर्डर सील करण्यात आलं असून, पाकिस्तानी नागरिकांना तातडीने आपल्या देशात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
व्हिसा सुविधा स्थगित केल्यामुळे व्यापार, पर्यटन, शिक्षण या क्षेत्रावरही मोठा परिणाम होणार आहे.





