नवी मुंबई महानगरपालिकेत आज महापालिका आयुक्त श्री. कैलाश शिंदे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा आहे, यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांपासून ते दीर्घकालीन विकासकामांपर्यंत सर्व बाबी तातडीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या चर्चेत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळावे, तसेच विकासकामे पारदर्शक, न्याय्य आणि कोणताही दुजाभाव न करता व्हावीत, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल अशा पद्धतीने कामकाज व्हावे, नियम, शिस्त आणि कायदेशीर चौकटीत राहून नगरसेवकांची विकासकामे पूर्ण व्हावीत, असे निर्देशही आयुक्तांना यावेळी देण्यात आले.
यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त श्री. कैलाश शिंदे यांनी प्रभागाच्या विकासासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींशी खांद्याला खांदा लावून काम करण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्टपणे सांगितले. शहराचा नियोजित विकास, मूलभूत सुविधांचे बळकटीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि नागरिककेंद्रित प्रशासन यासाठी समन्वयाने काम केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख श्री. द्वारकानाथ भोईर, श्री. किशोर पाटकर तसेच शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे नवी मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासनासोबत सकारात्मक भूमिका ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.