मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादाची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, दोन गुंड गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, जो पुढे हाणामारीत रूपांतरित झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच काही गुंडांनी थेट पोलिसांनाच लक्ष्य केले. या घटनेमुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत आरोपींना ताब्यात घेतले असून, गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
“गुंडांची मस्ती जिरवण्याची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नक्कीच आहे. मात्र त्यासाठी सरकारनेही पोलिसांना मोकळीक द्यायला हवी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत.”





