पुण्यातील औंध भागात खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर, राज्यभर रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत संतापाचा सूर पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. जगन्नाथ काळे या नागरिकाचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संताप आहे. रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक उखडून तयार झालेला खड्डा जीवघेणा ठरला. ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून भिवंडी, मुंबई-नाशिक, गोवा महामार्गही खड्ड्यांच्या विळख्यात अडकले आहेत.
प्रशासनाने प्रत्येक पावसाळ्यात फक्त घोषणाबाजी करून काम उरकले. कंत्राटदारांच्या लुटीला उत्तेजन दिलं जातंय, पण सामान्य जनतेचा जीव मात्र जातोय. खड्डे चुकवताना अनेकांचे अपघातात बळी जात आहेत, मणक्याचे आजार होत आहेत आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
राज्यभरात खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण २१% ने वाढले असून, ही परिस्थिती वर्षानुवर्षे सुरूच आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल का, की पुन्हा एकदा एखाद्याचा जीव जाईपर्यंतच चर्चा? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.