पंढरपूर (दि. ६ जुलै): आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत हरिनामाच्या गजरात भक्तिभावाने न्हालेलं वातावरण पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस यांच्यासह सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा करून राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि पोशाख अर्पण करण्यात आला. पूजेचा संपूर्ण विधी पारंपरिक रीतिरिवाजाने पार पडत असताना, मंदिर परिसर हरिनाम संकीर्तनाने निनादून गेला.
रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर देखील मुख्यमंत्र्यांनी पूजा केली आणि मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल, श्रीफळ आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
या वर्षीच्या आषाढी एकादशीत नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा सन्मान प्राप्त झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांचा सत्कार करत वारकरी परंपरेला सलाम केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी महापूजा करण्याचा योग आला. या पूजेद्वारे मी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.“
यावेळी मंदिर परिसरात भजन, कीर्तन, टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वातावरण अनुभवायला मिळालं. हजारो भाविकांची पंढरपूरात दर्शनासाठी उपस्थिती होती. वारी करून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं.
यंदाची आषाढी एकादशी ही केवळ एक धार्मिक पर्व नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा, संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या भक्तिपंथेचा अभूतपूर्व संगम ठरला.




