Home Breaking News उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

75
0

पिंपरी, दि.१३ मार्च २०२५:- पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. उष्णतेपासून बचावासाठी खालील उपाययोजना कराव्यात

काय करावे व काय करू नये

          उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून गंभीर आजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे परिणाम टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

काय करावे

१)    तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

२)    हलके, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत.

३)    बाहेर जाताना गॉगल, छत्री,टोपी, बुट व चपलांचा वापर करावा.

४)    प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

५)    उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावे.

६)    शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.

७)    अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

८)    पाळीव प्राण्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे व सावलीत ठेवावे.

९)    घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर, वाळयाचे पडदे व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्या.

१०) थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.

११) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

१२) सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

१३) पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.

१४) बाहेर कामकाज करीत असताना अधूनमधून ब्रेक घेउन आराम करावा.

१५) लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध व आजारी व्यक्तींची अधिकची काळजी घेण्यात यावी.

१६) रस्त्यांच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता सावलीचा आधार घ्यावा.

१७) आवश्यक तेवढाच व्यायाम करावा, अतिश्रम टाळावे.

 

काय करू नये

१)    लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेउ नये.

२)    दुपारी १२.०० ते ०४.०० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

३)    गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

४)    बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावित, दुपारी १२.०० ते ०४.०० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.

५)    उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वरील उपाययोजना कराव्यात असे आवाहन महापालीकेच्य वतीने करण्यात येत आहे.