महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आज अत्यंत मोठी घडामोड पाहायला मिळाली. मतमोजणीला फक्त काही तास बाकी असताना नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्या होणारी मतमोजणी अचानक पुढे ढकलत 21 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निर्णयाचा मोठा परिणाम उमेदवार, पक्ष आणि कार्यकर्त्यांवर होणार असून सर्वत्र या निर्णयाची चर्चा सुरू आहे.
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना, उद्याच्या मतमोजणीवर स्थगिती मिळाली. कोर्टाने अचानक दिलेल्या या आदेशामुळे अनेकांची धडधड वाढली आहे. काही उमेदवारांनी तर याला मानसिक तणावाचा काळ असेही संबोधले आहे.
फडणवीस: “२५-३० वर्षांत असं पहिल्यांदाच घडतंय!”
निवडणूक प्रक्रियेतील या मोठ्या बदलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया नोंदवली. पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्टपणे सांगितले की असा प्रकार आपल्या निवडणूक इतिहासात फार दुर्मिळ आहे.
मुख्यमंत्री म्हणाले—
“नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल अजून मी वाचलेला नाही. पण गेली २५-३० वर्षे स्थानिक निवडणुका पाहतोय… घोषित झालेल्या निवडणुकांच्या निकालांची तारीख पुढे जाणे हे प्रथमच पाहतोय. ही पद्धत योग्य वाटत नाही. मात्र खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांचा निकाल मान्य करावा लागेल.”
त्यांनी यापुढे निवडणूक आयोगावरही सूचक टीका करत म्हटले—
“इलेक्शन कमिशन देखील स्वायत्त आहे. उमेदवार मेहनत करतात, दिवस-रात्र प्रचार करतात आणि शेवटच्या क्षणी अशी स्थिती निर्माण होते. काहीच चूक नसतानाही उमेदवारांचा भ्रमनिरास होतो. व्यवस्थेच्या फेल्युरमुळे असे प्रकार होणे अयोग्य आहे.”
निवडणूक आयोगाने भविष्यात सुधारणा कराव्यात
फडणवीस पुढे म्हणाले—
“आगामी निवडणुकांची संख्या मोठी आहे. आयोगाने या प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे. अशा चुका पुन्हा होऊ नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे.”





