Home Breaking News पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : १५ लाखांचे दागिने ११ नागरिकांना परत; नागरिकांकडून...

पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : १५ लाखांचे दागिने ११ नागरिकांना परत; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने जबरी चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेले ₹15 लाख किमतीचे 200 ग्रॅम (20 तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत केले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांनी पुणे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

घटनाक्रम:

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांमध्ये विविध भागांमध्ये जबरी चोरी, घरफोडी आणि इतर चोरीचे 11 गुन्हे घडले होते. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत सुमारे ₹15 लाख असून त्याचे एकूण वजन 200 ग्रॅम (20 तोळे) होते.

दागिने परत करताना भावूक क्षण:

दि. 17 मार्च 2025 रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांच्या हस्ते गुन्ह्यातील 11 फिर्यादींना त्यांचे दागिने परत करण्यात आले. दागिने परत मिळाल्याने अनेक नागरिक भावूक झाले आणि त्यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

पोलिसांची कौतुकास्पद भूमिका:

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उपआयुक्त विशेष शाखा, श्री. मिलिंद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार उमाकांत ढोले, यास्मीन मणेर, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि बंडू सुतार यांच्या परिश्रमातून शक्य झाली आहे.

नागरिकांचा विश्वास वाढवणारी कारवाई

पोलिसांनी जप्त केलेले दागिने मूळ मालकांना परत केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीने पुणेकरांच्या सुरक्षेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.